<p><strong>Maharashtra Rain Live Updates :</strong> राज्याच्या काही भागात सध्या रिमझीम पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळं काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना देखील खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. </p> <p><strong>नाशिक पाऊस</strong></p> <p>नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, धरणांमधील एकूण सरासरी जलसाठा 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गंगापूर धरण (Gangapur Dam) 94 टक्के भरल्यामुळे मंगळवार दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी 3000 क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळं गंगापूर धरण संवाद झपाट्याने वाढ झाली आहे, त्याचबरोबर गंगापूर धरणातही पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळं गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.</p> <p><strong>औरंगाबाद पाऊस</strong></p> <p>धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून एकूण 47 हजार 760 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धरणाजवळील पैठण-शेवगावला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. तर गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. </p> <p><strong>भंडारा गोंदियात पूरस्थिती</strong></p> <p>भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. वैनगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. यात लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर पुलाचा समावेश असून प्रत्येक पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. तर लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. या पावसाच्या पुराच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी दिली होती. </p>
from maharashtra https://ift.tt/TjfCm3S
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, मात्र, भंडारा-गोंदियासह चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती
August 17, 2022
0
Tags